बांदा मंडल प्रभागात केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी उद्योग सुरू करण्याची केली मागणी
*💫बांदा दि.२४-:* : बांदा मंडल भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन बांदा मंडल प्रभागात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून फळप्रक्रिया, काथ्या तसेच तत्सम उद्योग सुरू करावेत, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब, बाळू सावंत, मधु देसाई, विकास केरकर, साईनाथ धारगळकर, अनिल पावसकर आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत मुसळधार पावसामुळे बांदा, इन्सुली, शेर्ले, विलवडे, ओटवणे, माडखोल, धवडकी यासह सह्याद्रीच्या पट्ट्यात सखल भागात असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरून स्थानिक दुकानदार व घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना केंद्राच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणीही यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांनी केली. बांदा मंडलात उद्योग उभारून जिल्ह्यातील गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या युवकांना स्थानिक भागात रोजगार निर्माण होईल यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहनही या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केले. त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील पदाधिकाऱ्यांनी ना. राणे यांना दिली. यावेळी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी या भागात उद्योग उभारणीसाठी आपण नक्कीच प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.
