विरोधकांबद्दल माझ्या मनात कटुता नाही;संदेश पारकर यांचे भावनिक उदगार
*💫कणकवली दि.१४-:* 35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दमध्ये मी अनेक चढ-उत्तार पाहिले आव्हानांचा सामना, भीती, दहशतही अनुभवली पण कधीही मनाने खचलो नाही, तर जनतेच्या हितासाठी व जिल्ह्याच्या विकासाकरिता अविरतपणे काम करत राहिलो म्हणनूच विरोधकांना पुरून उरलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले. राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी एक वेळ मला संधी द्यावी या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंतआदी उपस्थित होते. संदेश पारकर म्हणाले, विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदापासून माझी राजकीय इनिंग सुरू झाली. त्यानंतर कणकवलीचा दोन वेळा सरपंच झालो, मग नगराध्यक्ष, कोकण सिंचन मंडळाचा उपाध्यक्ष पदही उपभोगले. या पदांवर काम करताना मी जनतेचे हित व विकासाला महत्त्व दिले. तसेच जिल्ह्यातील राजकीय दहशतवादाविरोधात लढा दिल्यामुळे माझी राज्यभर ओळख निर्माण झाली. राजकीय प्रवासात मी काही चुकीचे निर्णय घेतले. त्यातून माझे मोठे नुकसान झाले. हे मला मान्य आहे. पण मी ज्या पक्षात असतो त्या पक्षाचे काम प्रामाणिपणे करतो. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आपण 30 वर्षांहून अधिक सोशल वर्क करीत आहे. या वर्कमुळे जनतेशी माझी नाळ जुळली आहे. जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम व आशीवार्द हे माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. माझा सहकारी सुबोध टिकले यांचे माझ्या वाढदिवसादिवशी निधन झाले. सुबोध टिकले यांचे विस्मरण होऊ नये म्हणून मी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतिदिनी महारक्तदान शिबिर आयोजित करीत असतो. जनतेच्या प्रेमामुळेच माझे नेतृत्व बहरत गेले. तसेच कोरोनाच्या काळात अनेकांना मदतीचा हात देऊन मी माणुसकीचे नाते जपले. मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्या पासून आजपर्यंत त्यांनी 75 दौरे केले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली. 966 कोटीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून दिली. त्यामुळे उदय सामंत हे जिल्ह्याचे खरे पालकमंत्री आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवसेनाच सिंधुदुर्गाचा विकास करू शकते, यात तिळमात्र शंका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पारकर झाले भावूक आव्हाने पेलली, दहशत, भीतीही अनुभवली, काही चुकीच्या निर्णयांमुळे मित्रही गमावले ते दुसर्या पक्षात जाऊन मोठे झाले. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांची उत्तरोतर प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
