एस. टी. महामंडळाने परवाना शुल्कमाफी बाबत निर्णय घ्यावा
*💫कणकवली दि.०६-:* राज्यातील एस. टी. बस स्थानकांतील दुकानदारांपैकी कोरोना महामारीची कालावधीत सर्वाधिक झळ एस. टी. च्या कोकण आणि विदर्भातील परवानाधारकांना सोसावी लागत आहे. राज्यातील काही विभागाचा अपवाद वगळता एस. टी. ची ग्रामीण आणि आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बऱ्यापैकी सुरू झाली आहे. मात्र कोकणसह विदर्भातील प्रवासी वाहतूक तुलनेने अत्यल्प प्रमाणात सुरू झाल्याने या भागातील दुकानदारांची ससेहोलपट झाली आहे. कोकण विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याने केवळ आंतरजिल्हा एस. टी. च्या प्रवासी फेऱ्या सुरू आहेत. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने स्थानकांतील उपहारगृहे, तसेच अन्य दुकानदारांपैकी ८० टक्के दुकाने बंद आहेत. कणकवली सारख्या मध्यवर्ती स्थानकातील १४ दुकानदारांपैकी केवळ चार-पाच दुकाने तग धरून अर्धवेळ सुरू आहेत. जेमतेम १० टक्के विक्री होते. तर देवगड, मालवण, वेंगुर्ला, तसेच कोकणातील किनारपट्टीवर एका टोकाला असलेल्या स्थानकांतील दुकानदार दुकान उघडण्याचे धाडस करु शकत नाहीत. तर विदर्भातील बहुतांश स्थानके अन्य राज्यातील सीमांवर एका टोकावर असल्याने आणि प्रवासी वाहतूक अत्यल्प असल्याने दुकाने गेली वर्ष सव्वा वर्षे बहुसंख्य बंद आहेत. ग्रामीण भागातील एस. टि. च्या फेऱ्या पुर्ववत सुरू झाल्यानंतर ही दुकाने सुरू होतील असे चित्र आहे. एस. टी. महामंडळाने परवाना शुल्क माफीबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने त्यांच्या डोक्यावर ही टांगती तलवार आहे. काहीनी एस. टी. कडे राजीनामे सादर केले आहेत. तर काहीजण राजीनामाच्या प्रवित्र्यात आहेत. एस. टी. महामंडळाने परवाना शुल्क माफी बाबत लवकर निर्णय घ्यावा या प्रतिक्षेत सर्वंजण आहेत.
