एस. टी. तील दुकानदारांच्या भाडेमाफीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेणार:ना.अनिल परब

टाळेबंदीत पुर्ण तर उर्वरीत कालावधीसाठी १५ टक्के शुल्क आकारणीची मागणी

*💫कणकवली दि.२६-:* कोरोना महामारीच्या कालावधीत एस. टी. ची प्रवासी सेवा आठ-नऊ महीने बंद होती. उर्वरित कालावधीतही सुरु असलेली प्रवासी सेवा अत्यंल्प होती. त्यामुळे एस. टी. च्या परवानाधारक दुकानदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या परवाना भाडे (शुल्क) माफीच्या मागणीबाबत येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी मुंबईतील भेटीच्या वेळी दिली. एस. टी. कँन्टीन आणि स्टाँलधारक परवानाधारक असोसिएशनचे अध्यक्ष राम हरल, कार्याध्यक्ष विजय ऐताल, मौलाली मूल्ला यांनी मुंबईतील मंत्रालया येथील कार्यालयात परिवहन मंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी परिवहन मंत्र्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी परवानाधारकांंच्या शुल्क माफी संदर्भात नव्याने निवेदन सादर केले. या निवेदनात परवानाधारकांच्या आर्थिक कोंडीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच कोरोना महामारीच्या कालावधीतील आठ नऊ महीन्यांच्या टाळेबंदीमध्ये एस. टी. ची प्रवासी सेवा पुर्णपणे बंद असल्याने या काळातील शुल्क पुर्णपणे माफ करावे, प्रवासी सेवा १०० टक्के पुर्ववत सुरू होईपर्यंत नाममात्र १५ टक्के शुल्क आकारावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मंत्र्यांनी पुर्ण निवेदन वाचून त्यावर येत्या बुधवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ असे सुतोवाच केले. दरम्यान पदाधिकाऱ्यानी क्रुषी मंत्री दादा भुसे यांची सदिच्छा भेट घेऊन सदरचे निवेदन सादर केले. त्यांनीही या प्रश्नी आपण परिवहन मंत्र्यांशी चर्चा करु. परवानाधारक दुकानदारांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगून सहकार्य करू, असे सांगितले. यावेळी निवेदनाच्या प्रती एस. टी. चे व्यवस्थापकिय संचालक चन्नै महाव्यवस्थापक माधव काळे यांना देण्यात आल्यात. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

You cannot copy content of this page