मालवण : (प्रतिनिधी)
मालवण येथील स.का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने टेलिकॉम सायबर अवेअरनेस कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे वक्ते शामजीभाई पटेल उपस्थित होते. तसेच बी. के. वर्षा, अशोक सडवेलकर या मान्यवरांसह कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. अन्वेषा कदम उपस्थित होत्या. प्राचार्य कैलास राबते यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. अन्वेषा कदम यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते शामजीभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील फसवणूक, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी, पासवर्ड व वैयक्तिक माहितीची गोपनीयता, सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर याविषयी उदाहरणांसह
सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमास प्रा. धामापूरकर व प्रा. मिलन सामंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा बर्वे यांनी केले, तर प्रा.मिलन सामंत यांनी आभार मानले.
