मसुरे डांगमोडे ग्रामस्थानी वेधले आमदारांचे लक्ष..
⚡मालवण ता.२८:-
मसुरे डांगमोडे – बेलाचीवाडी या रस्त्याचे काम गेला महिनाभर ठप्प आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हे रस्ता काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे असून ठेकेदाराने योग्य ते पाऊल न उचलल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, त्यामुळे याबाबत आमदार निलेश राणे यांनी लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदारास समज द्यावी, अशी मागणी मसूरे डांगमोडेच्या ग्रामस्थांनी मालवण पंचायत समितीच्या आमसभेत आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर आम. निलेश राणे यांनी १० मे पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मालवण येथे पार पडलेल्या आमसभेवेळी डांगमोडे ग्रामस्थांच्यावतीने प्रकाश ठाकूर यांनी रस्त्याविषयीं कैफियत मांडली यावेळी समीर ठाकूर, राजेंद्र ठाकूर बुधाजी ठाकूर प स सदस्य संजय ठाकूर गायत्री ठाकूर सोमा ठाकूर गुरुदास ठाकूर सुभाष ठाकूर मीनल ठाकूर वंदना चव्हाण साधना ठाकूर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी या सुमारे ३.१८ किमी रस्त्याच्या कामास प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग तीन मधून २६ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यारंभ आदेश प्राप्त झाला होता. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी २५ ऑगस्ट २०२५ असा होता. सदर रस्त्याचे केवळ खडीकरण सध्या पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये मोरी उभारण्यासाठी मारलेले खड्डे जसेच्या तसे आहेत. रस्त्यालगत या मारलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकी धारक तसेच ग्रामस्थ पडून अपघात घडत आहेत. सदर कामासाठी येथील ग्रामस्थांचे पूर्णपणे सहकार्य ठेकेदारास मिळत असताना अपेक्षित काम होत नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
मागील महिनाभर सदर रस्त्याचे काम पूर्णपणे ठप्प असून पावसाळा काही दिवसातच सुरू होणार आहे. या रस्त्यावरील मोऱ्यांचे काम पूर्ण न झाल्यास रस्ता वाहून जाणार आहे. मागील सहा ते सात महिने डांगमोडे या गावांमध्ये येणाऱ्या एसटीच्या आठ फेऱ्या रस्ता काम चालू असल्याने पूर्णपणे बंद आहेत. रस्ता काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांना एसटी अभावी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खाजगी रिक्षा धारक सुद्धा रस्ता मजबूत नसल्यामुळे दुप्पट भाडे आकारत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना रेशनिंग, बाजारहाट करणे खर्चिक ठरत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा एसटी बस अभावी पायपीट करत मसूरे येथे यावे लागत आहे. रात्रीच्यावेळी आरोग्य गरज आवश्यक असल्यास वैद्यकिय सेवा मिळणे अवघड बनले आहे. या रस्त्यावर पूर्णपणे धुळीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे ग्रामस्थांना श्वसनाचे आजार उद्भवत असून धुरळा ग्रामस्थांच्या घरामधील साहित्यावर पडून नुकसान होत आहे. रस्त्याचे काम करताना गटार व्यवस्था करणे आवश्यक असताना सुद्धा ठेकेदाराने कुठेही गटार व्यवस्था न केल्यामुळे पावसाळ्यातील सर्व पाणी रस्त्यावरून वाहणार आहे. त्यामुळे रस्ता सुद्धा वाहून जाणार आहे. पावसाळ्यात ग्रामस्थांना खाजगी वाहनाने या रस्त्यावरून जाणे सुद्धा धोक्याचे ठरणार आहे.
आमदार निलेश राणे हे शासन दरबारी राजकीय ताकद वापरून ग्रामस्थांसाठी अत्यावश्यक विकासकामांसाठी निधी खेचून आणत असताना ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे डांगमोडे ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. ठेकेदाराने योग्य ते पाऊल न उचलल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
