कांदळगाव येथे आग लागून आंबा- काजू बागायतीचे मोठे नुकसान…

⚡मालवण ता.२१-:
मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या मालकीच्या सुमारे १६ एकर बागायती क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आंबा व काजू बागायतीसह इतर झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, आग विझवीण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले असता बंब नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कांदळगाव येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांची बागायती आहे. चंद्रशेखर परब हे मुंबई येथे वास्तव्यास असून त्यांनी बागेची देखभाल दिलीप पांडुरंग साळकर यांच्याकडे सोपवली आहे. या बागायती मध्ये आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच कांदळगावचे सरपंच रणजित परब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना सतर्क केले. त्यानंतर लगतच्या कोळंब व हडी गावांतील ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.आग आटोक्यात आणण्यासाठी मालवण नगरपरिषदेकडे अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. मात्र, बंब नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर स्थानिकांच्या मदतीवरच आग नियंत्रणात आणण्याची वेळ आली.

सदर बागेत सुमारे ५५० आंबा कलमे, १५० काजू कलमे, ५० नारळाची झाडे तसेच इतर सुमारे ५० झाडांचा समावेश होता. विशेष म्हणजे, ही घटना ऐन आंबा काढणीच्या हंगामात घडल्याने परब कुटुंबियांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय सुमारे २०० मीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन देखील आगीत जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी दिलीप साळकर यांच्यासह सरपंच रणजित परब, प्रमोद कांडरकर, साक्षी कांडरकर, बाबू सुर्वे, तुषार साळकर, नागेश साळकर, राजन साळकर, बापू गावकर आणि इतर ग्रामस्थांनी अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

दरम्यान, एप्रिल व मे महिन्यात उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. अशा काळात अग्निशमन यंत्रणा सज्ज असणे अत्यावश्यक असताना नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त असल्याची बाब गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page