मालवण,दि प्रतिनिधी
मालवण पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद ‘काळ्या दगडावरची सफेद रेघ’ असल्याचे सांगत मालवणकरांचे मन आणि मत भाजपच्या बाजूने ठरले आहे, असा ठाम विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करणे, हा विरोधकांनी ‘रडीचा डाव’ टाकल्याचा पुरावा आहे. कोणाच्या मायचा लाल या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शहरात भाजपच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, राजू परुळेकर, विकी तोरसकर यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. शेलार म्हणाले, आम्हाला सेवा कोण देईल? रोज कोण भेटेल? विकासाची कामे कोण करेल? रस्ते, पाणी, गटार, सुशोभिकरण, दिवाबत्ती या सगळ्यात आमच्याबरोबर कोण राहील?’ या मुद्द्यांवर निवडणूक लढणे अपेक्षित आहे आणि भाजपची तीच भूमिका आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत या उच्च विद्याविभूषित, चळवळीमधील, सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रणी म्हणून काम पाहणाऱ्या, नम्र आणि प्रामाणिक उमेदवार आहेत. नगरसेवक पदाचे उमेदवार तावून सुलाखून निवडले असून, हे सर्व मंडळी २४ तास, ३६५ दिवस मालवण, मालवणी माणूस, मालवण पालिका आणि मालवणी माणसाची कामे यासाठी पूर्णतः समर्पित आहेत.
सेवक म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत असे सांगत त्यांनी जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, विनोद तावडे यांच्यासह आपली स्वतःची विकासाची गॅरंटी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश देत शेलार यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते घरोघरी प्रचार करताना विनम्रपणे सांगा की, मालवणच्या जनतेच्या पाठीमागे मोठा भाऊ देवा भाऊ खंबीरपणे उभा आहे. विकासाची द्वार मालवणपर्यंत पोहोचविण्याची भाजपची भूमिका असून पालकमंत्री त्या कामाला लागले आहेत आणि खासदारांनी या कामात नेतृत्व केले आहे.
मालवण शहराला सांस्कृतिक ओळख देणाऱ्या मामा वरेरकर नाट्यगृहाचे काम करण्याची धमक भाजपकडे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा, ज्यात सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गचा समावेश आहे, जागतिक वारसा स्थळात समावेश करण्याचे सौभाग्य भाजपला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
विकासाचा मुद्दा हाच भाजपचा अजेंडा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली.
विरोधकांनाही कळले आहे की भाजप जिंकत आहे, नगराध्यक्ष भाजपचा होत आहे, नगरसेवकही आमचे होत आहेत आणि शिल्पा खोत जिंकत आहेत. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतली असून शिल्पा खोत यांना आणि भाजपला घाबरून त्यांनी सोडपत्र दिले आहे, असे शेलार यांनी ठणकावून सांगितले.
ते म्हणाले, मालवण आणि मालवणी माणसाला कोणीही बदनाम करण्याचे काम केले तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरील खोटे आरोप भाजप सहन करणार नाही, असे सांगत, “सूर्यावर उडवलेली थुंकी तुमच्या तोंडावर उडेल,” अशी सणसणीत टीका त्यांनी केली. मालवणकरांनी कमळाला मत देऊन नगर पालिकेवर भाजपचे कमळ फुलवण्याचे आवाहन त्यांनी केले.
