⚡मालवण ता.०२-:
तारकर्ली येथून बंद झालेली एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी शुक्रवारपासून उपोषणाचा इशारा दिला होता. केरकर यांच्या उपोषणाची दखल घेत, एसटी प्रशासनाने शुक्रवारपासून बस पूर्ववत सुरू केल्याने डॉ. केरकर यांनी एसटीचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले.
तारकर्ली-देवबाग-मालवण या मार्गावरील बस सेवा एसटी आगाराने बंद केली होती. ही एसटी बस सेवा मालवण-वायरी भूतनाथ, तारकर्ली या मार्गावरून चालते. त्यामुळे ही बस सेवा देवबागात येत नव्हती. परंतु तारकर्ली बंदर जेटीपर्यंत एसटी बस सेवा सुरू ठेवण्यात कुठलीही हरकत नाही. त्यामुळे तात्काळ ही बस सेवा तारकर्ली बंदरजेटीपर्यंत सुरू न केल्यास डॉ. केरकर यांनी तारकर्ली ग्रामस्थांसह मालवण एसटी आगार कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेऊन बस सुरू करण्यात आली आहे.
डॉ. केरकर म्हणाले, हा तारकर्ली गावच्या एकजुटीचा विजय आहे. ही बस एसटी प्रशासनाने आंदोलनाच्या दणक्यानंतर सुरू केली. ग्रामस्थांना याला कोण जबाबदार आहे हे माहिती आहे. त्यामुळे तेव्हा पक्ष आणि नेत्यांच्या नावाचा वापर करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा बाजार लवकरच उठणार आहे. जोपर्यंत गावाचा विश्वास माझ्यावर आहे, तोपर्यंत गावावर आलेल्या प्रत्येक संकटात उतरून लढा देणार. गावाला उपऱ्या नेतृत्वाची गरज नाही. गाव सक्षम आहे, असेही डॉ. केरकर यांनी म्हटले आहे.
