मराठी भाषेच्या संवर्धनासाठी रोजच्या जीवनात अस्खलित मराठी भाषेचा वापर होणे गरजेचे…

पुरस्कारप्राप्त कवी प्रा. भाऊसाहेब गोसावी यांचे मराठी भाषा दिनी प्रतिपादन..

मालवण दि प्रतिनिधी
आज सर्व क्षेत्रात पाश्चात्य संस्कृती बरोबरच पाश्चात्य भाषांचं आक्रमण वाढत चालले आहे दैनंदिन जीवनात आपण बोलताना इंग्रजी शब्दांचा जो अनिर्बंध वापर करत आहोत, त्याला आळा घातला पाहिजे, ज्ञानदेवांनी आणि संत महंतांनी, मराठी भाषा प्रभुनी आणि साहित्यिकांनी सजवलेली मराठी भाषा टिकवायची असेल तर आपल्या रोजच्या जीवनात अस्खलित मराठी भाषेचा वापर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे पुरस्कार प्राप्त कवी आणि सावंतवाडी कारीवडे गावचे सुपुत्र प्रा. भाऊसाहेब गोसावी यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला त्यावेळी प्रा भाऊसाहेब गोसावी हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन श्री सुधीर हेरेकर, संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार श्री जॉन नरोन्हा सेक्रेटरी श्री दशरथ कवठकर मुख्याध्यापक एच बी तिवले, पर्यवेक्षक आर डी बनसोडे, सौ अस्मिता वाईरकर ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई कु पूजा कुडाळकर आदी उपस्थित होते

प्रारंभी मुख्याध्यापक श्री तीवले यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक बनसोडे यानी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ अस्मिता वाईरकर यांनी करून दिला. यावेळी प्रा. भाऊसाहेब गोसावी यांचा संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री गोसावी म्हणाले, ज्ञानदेवांनी मराठी भाषेची महती सांगताना माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके असे म्हटले आहे. अशी आपली मराठी भाषा असताना या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत त्यांनी मराठी भाषेचे महत्व विषद केले. यावेळी जॉन नरोना यांचेही समायोचित भाषण झाले. शेवटी पूजा कुडाळकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page