बांदा सरपंच अक्रम खान यांची माहिती
*💫बांदा दि.०९-:* महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊन केले असले तरी गोव्यात नोकरीनिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणांसाठी कोणतेही बंधन घालण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी कामावर नेहमीप्रमाणे जावे. त्यांना येताना-जाताना कोणती अडचण होणार नाही अशी माहिती बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिली. श्री खान यांनी आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन केले आहे. मात्र शनिवारी व रविवारी नोकरीनिमित्त गोवा राज्यात प्रवास करणाऱ्या तरुण नोकरदार वर्गाला यातून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील तरुणांनी अफवांवर विश्वास न ठेवता नोकरीसाठी प्रवास करावा. त्यांना प्रवास करताना किंवा पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असे अक्रम खान यांनी सांगितले. यासंदर्भात खान यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन असताना सर्व आस्थापने बंद ठेवण्यात येणार असून पूर्णपणे संचारबंदी असल्याने सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमाभागातील सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग येथील शेकडो तरुण, तरुणी या गोवा राज्यात खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करतात. नोकरीनिमित्त दररोज ये-जा करत असल्याने या तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात तरुणांनी सरपंच खान यांचे लक्ष वेधले होते. खान यांनी तात्काळ सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. म्हात्रे यांनी तरुणांना प्रवास करताना कोणतीही आडकाठी होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी गोव्यात नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या तरुणांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नसून त्यांनी नियमित प्रवास करावा असे आवाहन सरपंच खान यांनी केले आहे.
