रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार नाही…

राजन तेली:भाजप सावंतवाडीतून स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत; परंतु वरिष्ठच निर्णय घेणार..

⚡सावंतवाडी ता.२२-: रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार नाही. रवींद्र चव्हाण हे ठाण्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत लोकसभा विजयाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामदास कदम यांना आवरण्यासाठी मागणी करणार आहोत, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तो पर्यंत शिवसेनेच्या बैठकीला जाणार नाही असा पवित्रा आम्ही घेतला आहे असे श्री तेली यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी रामदास कदम यांचा निषेध व्यक्त केला. श्री तेली आज सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे हे कोकणचे नेते आहेतच. पण, त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती. रविंद्र चव्हाण यांच्यावर कोकणची जबाबदारी होती. भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकावर जबाबदारी दिली होती. मोठ्या नेत्यांवर सामुदायिक राज्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे यात गल्लत होऊ नये असे श्री.तेली म्हणाले.

दरम्यान कामासाठी व दर्जेदार रस्त्यासाठी जगात नाव घेतलं जाणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कोकणच्या हायवे समोर हात टेकले. त्यांनी स्वतः असे विधान केले आहे की देशात चांगले रस्ते घडवताना कोकणात अनेक अडथळ्यांना सामना करावा लागला. रविंद्र चव्हाण यांनी मंत्री म्हणून यासाठी प्रयत्न केले. आज हा प्रश्न मार्गी लागत आहे. ठेकेदार, कोर्ट प्रकरणामुळे हे काम रखडले. सिंधुदुर्गसारख काम रत्नागिरी, रायगडमध्ये झालं असतं. तर ही अवस्था नसती. रविंद्र चव्हाण यांच्यामुळे काम सुरू झालेले दिसत आहेत. रस्ता पुर्ण न होण्यासाठी अनेक कारणे आहेत. भाजप सावंतवाडीतून तयारीत आहे. २८८ मतदारसंघातही आमची तयारी सुरू आहे.‌ मात्र, आमचे नेते महायुतीचा निर्णय घेतील‌.‌ त्यांचा निर्णय हा अंतिम रहाणार आहे‌. असे श्री.तेली यांनी यावेळी सांगितले

यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष अजय सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page