नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार
*💫मुंबई दि.०२-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहेत. कोरोना सुरु झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली होती. माझे-कुटुंब माझी-जबाबदारी, पण ही घोषणा म्हणणारे मुख्यमंत्री जबाबदारी पेलण्यात अपयशी ठरले आहेत. कारण, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबालाच कोरोना झाला आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलाला कोरोना झाला होता, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांचं धोरणच चुकीचं आहे, त्यामुळे राज्यात कोरोना वाढल्याचा आरोपही राणेंनी केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, मुंबईत काय यंत्रणा आहे?. वर्षभरात 18 हजार बेड तुम्ही उपलब्ध करु शकले नाहीत. देशातील इतर राज्यात कोरोनाची संख्या कमी झालीय. मग, महाराष्ट्रातच कशी वाढतेय?, देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच आहेत, मग सरकारने काय केलं? असा सवाल राणे यांनी विचारला आहे. राज्यातून लॉकडाऊनला विरोध होत आहे, व्यापाऱ्यांकडून उठाव झाला आहे. त्यामुळे, हे जागे झाले आहेत. नागरिकांना मान सन्मान देऊन बोलायला हवं, पण धमक्या दिल्या जात आहेत. लॉकडाऊन करण्याच्या धमक्या दिल्या जातात, पण गरिबांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाबद्दल काहीही बोलत नाही. मी मातोश्रीवर बसतो, तुम्हीही तुमच्या घरात बसा, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, तुमची जेवायची सोय होते, पण लोकांनी काय खायचं? मुलांना शिकवायचं कसं? दोन टायमाचं जेवणाचं पॅकेट मुख्यमंत्री लोकांच्या घरी पाठवणार आहेत का?, असे म्हणत नारायण राणेंनी लॉकडाऊनला आपला विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य आर्थिक अधोगतीकडे गेले आहे, केवळ मुख्यमंत्री आणि सरकारच्या धोरणामुळे ही वेळ आलीय. राज्यातील बेकारी मोठ्या प्रमाणात वाढलीय. सगळे धंदे कोलडमले आहेत. हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या लॉकडाऊन भूमिकेला आमचा विरोध असल्याची भूमिका राणेंनी पत्रकार परिषदेत आक्रमकपणे मांडली.
