रमेश कीर:कोकण पदवीधर मतदार संघातून अनेक आमदार निवडून गेलेत मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केले…
कुडाळ : कोकणातील पदवीधरांसाठी, इथल्या बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीवर जिथे जिथे शक्य आहे तिथे या बेरोजगार पदवीधरांना समाविष्ट करणे आणि स्थानीक प्रकल्पात या बेरोजगारांना कसे समाविष्ट करून घेता येईल यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांनी सांगितलं. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोकण पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग सरचिटणीस प्रकाश जैतापकर, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभु, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष तबरेज शेख, सोनल सावंत, शुंभागी काळसेकर, सोनल सावंत, सुंदरवल्ली स्वामी तसेच महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रमेश कीर म्हणाले,कोकण पदवीधर मतदार संघातून अनेक आमदार निवडून गेलेत मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केले नाही. काही आमदार तर जास्त बोलतात मात्र त्यांचं काम कमी आहे, मी कमी बोलतो पण काम जास्त करतो असा टोला महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर संघाचे उमेदवार रमेश कीर यांनी महायुतीच्या उमेदवाराला लगावला.
कोकण पदवीधर मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ असून पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी, पदवीधर, शिक्षकांचे, शैक्षणिक संस्थांचे तसेच शिक्षणा संदर्भातील इतर अनेक प्रश्न प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांकडे या अगोदरच्या आमदारांनी दुर्लक्ष केल्याने हे प्रश्न व ते प्रलंबित आहेत. व ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन.
कोकण विभागीय मंडळ तयार झाल्यानंतर सर्व परीक्षेच्या निकालात राज्यात कोकण विभागाचा आतापर्यंत प्रथम क्रमांक येत आहे. मात्र या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन येथील विद्यार्थ्यांना कमी मिळत असल्याने. येथील विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे कोकणातील मुलांना स्पर्धा परीक्षांच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे येथील शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत मात्र पूरक परिस्थितीत ही या संस्था शैक्षणिक कार्य चालवीत आहेत. येथील डीएड बेरोजगारांची जी मागणी आहे ती योग्य असून या मागणीचा विचार सरकारने केला पाहिजे.
शासनाची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही कोकणासाठी घातक असून ती कोकणासाठी तारक नाही. संपूर्ण कोकणात ही जनजागृती करणे आवश्यक असुन याबाबत सर्व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांशी चर्चा घेऊन अंतिम निर्णय आम्ही घेणार असल्याचेही रमेश कीर यांनी सांगितले. ही निवडणूक ही राजकारण विरहित असावी कारण येथे कोकणातील विद्यार्थी शिक्षक बेरोजगार पदवीधर बेरोजगार शैक्षणिक संस्था यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा याकरिता ही विधानपरिषद आहे, असे श्री. कीर शेवटी म्हणाले.
