संदेश पारकर यांचे आवाहन ः कणकवलीत काॅंग्रेसची बैठक..
कणकवली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दाखवून देशवासीयांचा भम्रनिरास केला. मागील 10 वर्षांत सरकारी कंपन्या विकण्याचे काम केले. त्यामुळे देशात राजकीय परिवर्तन होणे गरजेचे असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांना विजयी करावे, असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाची कणकवलीत बैठक पार पडली. यात प्रसंगी श्री. पारकर बोलत होते.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अनिल डेगवेकर, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नागेश मोर्ये, बाळू मेस्त्री, आबू पटेल, व्ही. के सावंत, प्रदीप वरूणकर, संतोष टक्के, श्रीमती म्हापणकर, अजू मोरये, राजू वर्णे, महेश तेली, भाई तावडे व इतर उपस्थित होते. बैठकीत राऊत यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला. राऊत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. याबाबत सुशांत नाईक यांनी काॅंग्रेस पक्षाचे आभार मानले. काँग्रेसने या देशाला एक विचार दिला. मात्र, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारकडून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात आले. विरोधक संपवून टाकण्याचे काम शासकीय यंत्रर्णांना हाताशी धरून करण्यात आले. देशात महागाई वाढली आहे. सर्वसामान्य शेतकरी, गरीबांना जगणे कठिण बनले आहे म्हणूनच आता परिवर्तन अटळ असून आपण सर्वांनी मिळून ते घडवूया, असे आवाहन पारकर यांनी केले.
काँग्रेसचे नेते राहून गांधी यांच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित करून भाजपाने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदयात्रेनंतर राहून गांधीची प्रतिमा अधिक उजळून आली. आज देशात इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून राहूल गांधीचे नाव घेतले जात आहे. भाजपने राहुल गांधी यांना संपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते संपणार नाहीत. कारण काॅंग्रेस हा देशाच्या स्वातंत्र्यापासूनचा एक विचारधारा घेऊन जाणारा पक्ष आहे. या सर्वाच्या आघाडीच्या माध्यमातून विनायक राऊत हे लोकसभा लढवत असून सर्वांनी मिळून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया, असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले. यावेळी प्रदीप मांजरेकर, अनिल डेगवेकर, नागेश मोरये, आबू पटेल व इतरांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण वरूणकर यांनी केले.
