शेतकरी अत्यवस्थ : शेत मांगर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी
*💫बांदा दि.२६-:* मुंबई-गोवा महामार्गालगत बांदा सटमटवाडी टोल नाक्यानजीक लागलेल्या भीषण आगीत पाच एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक झाली. आग विझविताना शेतकरी रामदास धोंडू गडकरी हे अत्यवस्थ झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बागायतीतील शेत मांगर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत ऐन काजू हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागली त्यावेळी रामदास गडकरी हे आपल्या शेत मांगरात होते. दुपारी आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझविताना गडकरी यांचा शेत मांगर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग विझविताना आगीच्या ज्वाळा अंगावर आल्याने गडकरी हे अत्यवस्थ झालेत. त्यांना लागलीच तेथून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आगीत गडकरी व बाळकृष्ण शिरोडकर यांच्या बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
