⚡कणकवली ता.१२-: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली गेली ४६ वर्ष सांस्कृतिक चळवळ राबवित आहे. कणकवली आणि परिसरातील नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी असून या माध्यमातून समाज भान देण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. संस्थेच्या प्रतिवर्षी होणाऱ्या कायमस्वरूपी उपक्रमांमधील नाट्य उत्सव हा एक उपक्रम आहे.
गेली ३१ वर्ष सातत्याने प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटकांचा महोत्सव संस्था आयोजित करीत असते. मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवात आजपर्यंत जवळजवळ २२५ दर्जेदार नाटकांचा सादरीकरण झाले असून या नाट्यमहोत्सवात नसरुद्दीन शहा, डॉ. श्रीराम लागू ,अमोल पालेकर दिलीप कुलकर्णी, नीना कुलकर्णी सचिन खेडेकर, अतुल पेठे,गजानन परांजपे,सतीश आळेकर, डॉ.मोहन आगाशे अशा रंगभूमीवरील दिग्गज कलावंतांनी आपली कला सादर केली आहे.
यावर्षीच्या मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सवाचे हे ३१ वे वर्ष असून यावर्षी एकूण आठ नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत त्यामध्ये २३ फेब्रुवारी २०२४ रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित- कृष्ण किनारा, २४ फेब्रुवारी रोजी फ्लेमिंगो गोवा निर्मित- बोरो आणि मुकभट ही दोन दीर्घांक ,
२५ फेब्रुवारी रोजी एनसीपीए निर्मित – कलगीतुरा, २६ फेब्रुवारी रोजी बाबा वर्दम थिएटर कुडाळ निर्मित- त्या तिघांची गोष्ट,
२७ फेब्रुवारी रोजी भद्रकाली प्रोडक्शन चे- माझ्या बायकोचा नवरा, २८ फेब्रुवारी रूपक निर्मित- प्रिय भाई एक कविता हवी आहे,
२९ फेब्रुवारी रोजी जागर आणि गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज निर्मित – कवी जातो तेव्हा, ही आठ नाटके सादर होणार आहेत यामध्ये मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध कलावंत सागर देशमुख,अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर आणि मुक्ता बर्वे यांचा सहभाग असणार आहे.
या संपूर्ण नाट्यमहोत्सवाच्या प्रवेशिकेची फी 1500/- 1000/- व 500/- एवढी असून या प्रवेशिकेसाठी 9421644080 व 8208836683 या दूरध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी केले आहे.
