शिक्षक परत बोलावण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन..
⚡दोडामार्ग,ता.१९-: उसप बोकारवाडीतील शाळेत कामगिरीवर पाठवलेला शिक्षक पुन्हा शाळेत बोलावण्यासाठी खोक्रल ग्रामस्थांनी कालपासून शाळा बंद आंदोलन केले. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी मुलांना शाळेत न पाठवता शाळाच मंदिरात भरवली.त्यामुळे शाळा बंद;शिक्षण सुरू असे चित्र पाहायला मिळाले.
जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून एकच शिक्षक शाळेत कर्तव्यावर आहे.या शाळेतील दुसरे शिक्षक शिक्षण विभागाने उसप बोकारवाडी येथे कामगिरीवर पाठवले आहेत.जिल्ह्यातील शेकडो शिक्षक एकाचवेळी बदलीमुळे जिल्ह्याबाहेर गेल्याने अपुरी शिक्षक संख्या आहे.तालुक्यातील अनेक शाळा शून्य शिक्षकी आहेत. त्यामुळे शाळा चालवताना शिक्षण विभागाची दमछाक होत आहे.एकच शिक्षक असल्याने खोक्रल मधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे कामगिरीवर पाठवलेल्या शिक्षकाला परत बोलावण्यासाठी काल सर्व पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला.त्यांना मंदिरात बसवून स्थानिक युवकांकडून शिकवणी दिली जात होती.जोपर्यंत शिक्षक दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पालक व ग्रामस्थांनी घेतला आहे.
