जिल्हाधिकारी किशोर तावडे:जिल्ह्यात योजनेचा झाला शुभारंभ
सिंधुदुर्गनगरी ता १३
केंद्र शासनाची आयुष्यमान भव ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय लाभदायी अशी आहे. या योजनेचा शुभारंभ आज जिल्ह्यात झाला असून या योजनेअंतर्गत आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आजच्या शुभारंभ कार्यक्रमात केले.
केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी “आयुष्यमान भव” मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या या आयुष्यमान भव योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना मोफत तपासणी व पाच लाखापर्यंत उपचाराचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दीप प्रज्वलन करून आज करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ सुनिता रामानंद ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुबोध इंगळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षल जाधव, आदी मान्यवर व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले केंद्र शासनाची आयुष्यमान भव ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायी अशी ठरणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करावेत.
यावेळी या योजनेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी माहिती दिली. आयुष्यमान भव ही योजना केंद्र शासनाची असून या योजनेचा आज केंद्र व राज्य स्तरावर उद्घाटन सोहळा पार पडला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये आयुष्यमान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान आयुष्यमान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेंळावा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम , आयुष्यमान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळा मधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञा मार्फत आठवड्याला किमान एका आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर महिन्याच्या दर आठवड्यातील शनिवारी आयुष्यमान मेंळावा आयोजित करण्यात येईल. यामध्ये असंसर्गजन्य रोग, क्षयरोग, कुष्ठरोग, आणि इतर संसर्गजन्य आजार, माता बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, तसेच आदिवासी भागामध्ये कान ,नाक, घसा व नेत्ररोग चिकित्सा याबाबत तपासणी करण्यात येईल व आवश्यकतेनुसार चष्म्याचे वाटप करण्यात येईल .तसेच या मेळाव्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे यापूर्वी आभा व आयुष्यमान कार्ड काढले नसेल त्यांना ते तयार करून देण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे टप्प्याटप्प्याने आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. या मेळाव्यांमध्ये स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान नाक व घसा, त्वचारोग, मानसिक आजार, दंत शल्य चिकित्सक, यांच्यामार्फत आरोग्य सुविधा देण्यात येतील. याकरिता आवश्यक औषधे व प्रयोगशाळा तपासणी इत्यादी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. अशी माहिती यावेळी डॉ सई धुरी यांनी दिली.
केंद्र शासनाच्या “आयुष्यमान भव” या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या शुभारंभ नंतर जिल्ह्यात विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय, शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा समन्वयाने काम करून ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल. अशी ग्वाही यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.
