कणकवली महाविद्यालयात संत रविदास महाराज रोहिदास जयंती साजरी…

*💫कणकवली दि.०२-:* येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले होते तर विचार मंचावर पर्यवेक्षक मंगलदास कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.सोमनाथ कदम यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. डॉ. सोमनाथ कदम म्हणाले, “संत रोहिदास महाराज यांनी समाजात शांतता, समानता, न्याय, बंधुता व खऱ्या भक्तीचा प्रसार केला. तत्कालीन जातीयतेवर त्यांनी कठोर टीका केली. समाजातील सर्व स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब अशा सर्वांना समान वागणूक देणारे राज्य असावे अशी अपेक्षा संत रविदास यांनी त्यांच्या ओव्यातून केलेली दिसते. संत रोहिदास महाराज यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणा देणारे आदर्शवत् आहे.” अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ राजेंद्र चौगुले म्हणाले की, महाराष्ट्रात भक्ती चळवळीने समाजामध्ये नवं चैतन्य आणले. वेगवेगळ्या जातीतून आलेल्या या संतांनी माणुसकीचा धर्म हाच खरा धर्म असल्याची शिकवण दिली. भारतीय समाजात व जातीयता व सामाजिक बेकी हीच आपल्या देशाच्या अधोगतीचे एक प्रमुख कारण आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महानंद चव्हाण यांनी केले. या प्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page