माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा खोचक प्रश्न
⚡सावंतवाडी ता.११-: राज्याचे शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे भांग पितात का ? असा सवाल विचारत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीतून आपण बाहेर का पडलो याची ते दर महिन्याला वेगवेगळी कारण देत असल्याचे आम्हाला हा प्रश्न पडला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेतून ४० आमदार सर्वात प्रथम हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत जात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असे सांगत ते सत्तेतून बाहेर येत त्यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली. तसेच या ४० ही आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला भेटत नसल्याचे कारण देखील पुढे केले होते. तसेच खासदार संजय राऊत यांच्या जाचाला कंटाळून आपण बाहेर पडत आहोत असे देखील ते म्हणाले होते. तर अजित पवार हे शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. तेच राज्याचे शिक्षण मंत्री आज तालुक्यातील आंबोली येथील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला सत्ता बदलावी लागली असे विधान करत आहेत. यातील नक्की कोणते कारण खरे आहे. असा सवाल साळगावकर यानी आमदार दीपक केसरकर यांना विचारला असून, दीपक केसरकर यांनी एकदा तरी खरे बोलावे असे आवाहन केले आहे.
