हिंदू जनजागृती समिती राज्य समन्वयक सुनील घनवट
ओरोस ता.१२-:
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी देशात चळवळ सुरू झाली आहे. अनेक संघटना या मागणीसाठी पुढे आल्या आहेत. या हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षी अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन घेतले जाते. यावर्षी हे अधिवेशन वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव म्हणून १६ ते २२ जून या कालावधीत गोवा राज्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी गोरक्षक स्वागत नाटेकर, सनातन संस्थेचे शंकर निकम, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत मणेरिकर, रवींद्र परब, गजानन मुंज आदी उपस्थित होते. पुढे बोलताना घनवट यांनी, गोवा येथे गेल्या ११ वर्षांपासून होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झाली आहे. यामध्ये आता हिंदु राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत; मात्र दुसरीकडे देशात इस्लामिक स्टेटच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी पोलीस प्रशासनाला आव्हान देत आहेत, हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत; तर मणिपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित झालेला नाही. देशभरात साक्षी, अनुराधा, श्रद्धा वालकर यांसारख्या असंख्य हिंदू मुलींच्या ‘लव्ह जिहादीं’कडून होणार्या निर्घृण हत्या पाहता देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, असल्याचे ते म्हणाले.
