⚡बांदा ता.०७-: बांदा नट वाचनालयात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा मूर्तिमंत पुतळा, न्यायाचा आणि शिस्तीचा आदर्श, गरिबांचा कैवारी, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून त्यांचा उदो उदो होतो.
६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.
हा राज्याभिषेक काशी क्षेत्री प्रसिद्ध असलेले पंडित गागाभट्ट यांनी वैदिक विधीनुसार केला. यावेळी छत्रपतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व माननीय विद्यमान अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास संचालक जगन्नाथ सातोस्कर, हेमंत मौर्य, सौ. स्वप्निता सावंत , प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर , अनंत भाटे, गणपत नाईक, ग्रंथपाल सौ प्रमिला मोरजकर-नाईक , सौ अमिता परब, सुनील नातू आदी उपस्थित होते. अनंत भाटे व अध्यक्ष एस आर सावंत यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
