निलेश मोरजकर ; केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
⚡बांदा ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे आताच्या पिढीला देणे हे खुप गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना छत्रपतींचे विचार देऊन प्रेरित करा. तरच खऱ्या अर्थाने महाराजांचे कार्य व विचार हे प्रत्येकाच्या मनामनात व घराघरात पोहोचतील असे प्रतिपादन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी येथे केले.
येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक व धार्मिक पद्धतीने प्रशालेचा विद्यार्थी नैतिक मोरजकर याच्या हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे खजिनदार भूषण सावंत यांनी उपस्थिताना शिवविचारांवर मार्गदर्शन केले. त्यांनी इतिहासातील विविध विषयांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलुंचे, त्यांच्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनाचे दाखले यावेळी दिलेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट शासक
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ते उत्कृष्ट शासक तर होतेच. मात्र रयतेच्या मनातील जाणणारे जाणते राजा होते. त्यांच्या कार्यपाद्धतीमुळेच स्वराज्याचा विस्तार झाला. त्यांचे कार्य व विचार आताच्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी यांनी सांगितले.
आभार संकेत वेंगुर्लेकर यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघांचे सचिव गुरुनाथ नार्वेकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, बाबी वसकर, मंथन सावंत, जगन्नाथ सातोसकर, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, वेदिका गावडे आदी उपस्थित होते.
