द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्रसेवादल

ॲड.संदीप निंबाळकर;अद्वैत फाउंडेशन आयोजित राष्ट्र सेवादल शिबिराचे उदघाटन

⚡कणकवली ता.११-: टीव्ही , मोबाईल आणि देशात सध्या असलेल्या द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्र सेवादल होय असे प्रतिपादन ॲड. संदीप निंबाळकर यांनी केले.

अद्वैत फाउंडेशन कणकवलीच्यावतीने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबिरात ॲड. निंबाळकर बोलत होते. यावेळी अद्वैत फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, गोपुरी आश्रमचे संचालक बाळू मेस्त्री, भानू गोंडाळ, विजय चव्हाण, बबन मापारी , हरिश्चंद्र सरमळकर, हर्षदा सरमळकर , विद्या राणे, विजय हेगन्नावर, शुभम चौगुले,विश्वास राशिवडे ,सतीश सौदे आदी उपस्थित होते.
ॲड. निंबाळकर यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ॲड. निंबाळकर म्हणाले, बालपणापासूनच युवा पिढीवर मानवतावादाचे संस्कार बिंबवणे अत्यावश्यक आहे.राष्ट्र सेवादलच्या माध्यमातून जात धर्माच्या पलीकडेही माणुसकी हाच धर्म असून स्त्री पुरुष समानतेचा विचार आणि संस्कार युवा पिढीच्या मनात रुजवला जातो. अद्वैत फाउंडेशनने राष्ट्र सेवादलचे शिबीर आयोजित करून बाल पिढीला ही सुसंधी निर्माण करून दिली आहे.
गोपुरी आश्रमचे संचालक बाळू मेस्त्री यांनी कोकणगांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कर्मभूमीत अद्वैत फाउंडेशन आयोजित या शिबिराद्वारे सुसंस्कारी पिढी तयार होईल असे सांगितले.
जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्यावतीने शिबरार्थीना शिवाजी कोण होता ?पुस्तक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटील यांनी केले. प्रास्ताविक सरिता पवार यांनी केले तर आभार राजन चव्हाण यांनी मानले.

You cannot copy content of this page