⚡कणकवली ता.१०-: आपल्या जीवनातील ध्येय कोणतेही असो ते साध्य करण्यासाठी स्वतःतील कुवत व तिच्या मर्यादा जाणून घेणे व आपल्यातील असमर्थता काय आहेत याचे भान ठेवणे गरजेचे आहे . आपल्यातील अंगभूत शक्तीचा शोध घेणे हे महत्वाचे आहे . जीवनामध्ये जी माणसे यशस्वी होतात , ती निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत करतात सातत्याने प्रयत्न केल्यानेच व्यक्तीची त्यांच्या कामावरील निष्ठा, पात्रता , त्यांची धडपड व कामात झोकून देण्याची वृत्ती हीच त्यांच्या कामाला बळकटी देते .प्रयत्नच्या बळावर त्यांनी केलेली साधना त्याला आत्मविश्वास देत असते.असे प्रतिपादन स.का.पाटील सिंधूदुर्ग महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते यांनी केले.
जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांनी महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या क्षमता बांधणी कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ” यशस्वी उद्योजक होण्याची गुरुकिल्ली ” या विषयाच्या अनुषंगाने बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासीठावर मानव साधन विकास संस्थेचा अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू , जन शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. शरद सावंत , लुपिन फाऊंडेशनचे योगेश प्रभू , सौ. यशस्वी सावंत , सुधीर पालव , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रमाकांत मेस्त्री , रमेश खरात आदी मान्यवर उपस्थित होते .
पुढे बोलताना प्रा. राबते म्हणाले की , आपण निवडलेला कोणताही उद्योग असेल किंवा काम असेल त्यांचावर पूर्ण निष्ठा असणे महत्वाचे आहे. निवडलेल्या कामावर उद्योगावर लक्ष केंद्रित करणे , सकारात्मक विचार ठेवून कामाला लागणे येणाऱ्या संकटावर मात करीत पुढे जाणे त्यात स्वतःला झोकून देणे, हीच उत्कृष्ट उद्योजकाची लक्षणे आहेत हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे ही त्यांनी आपल्या व्याख्यानातून सूचित केले.
यावेळी सौ. उमा प्रभू आणि डॉ. शरद सावंत यांनी उपस्थित सर्व सहभागीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत मेस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश खरात यांनी मानले .
