शिवजयंती सोहळ्याचे औचित्य; स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन..
बांदा/प्रतिनिधी
शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक १६ रोजी सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ येथे होणार आहे.
स्पर्धा दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी “मला आवडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा” हा विषय असून यासाठी सादरीकरण वेळ ३ ते ५ मिनिटे आहे. पाचवी ते आठवी या गटासाठी “छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल संघटक”, किंवा “धिरोदत्त राजा छत्रपती शिवाजी महाराज” हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. इयत्ता नववी ते इयत्ता बारावी या गटासाठी “छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्थकारण”, किंवा “रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज” हे विषय ठेवण्यात आले असून सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. खुला गटासाठी “छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेती आणि व्यापार विषयक धोरण”, किंवा “छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट इंजिनियर” हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे रुपये १०००, ७००, ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी भूषण सावंत, (मो. 7517850204), किंवा अक्षय मयेकर, (मो. ९५०३८७१९२४) यांच्याशी संपर्क साधावा. विजेत्यांना १९ रोजी खेमराज प्रशाळेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी सर्वाना प्रवेश विनामुल्य असून ही स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित होणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत यांनी केले आहे.
