⚡बांदा ता.३१-: न्हावेली-गोळचेगावळ येथील काजू बागायती मध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास गव्यांच्या कळपाने बागायतदारांचे मोठे नुकसान केले. दहा ते पंधरा काजूची लागती कलमे भुईसपाट केल्याने अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बागायतदारांनी सांगितले. तसेच वनविभागाने अशा उच्छाद मांडणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली.
ऐन काजू हंगामात रविवारी पहाटेच्या सुमारास तीन ते चार गव्यांचा कळप न्हावेली गोळाचेगावळ येथे आला. गेले तीन वर्ष मेहनत करून उत्पन्न देणारी काजूची कलमे बागायतदारांनी तयार केली होती. सद्यस्थितीत उत्पन्न देणारी कलमे गव्यांनी जमीनदोस्त केल्याने आमचे अंदाजे 50 हजारांच्यावर नुकसान झाल्याचे काजू बागायतदार धोंडू परब, भदूजी नाईक, दिपक नाईक यांनी सांगितले.
वारंवार होणाऱ्या नुकसानीपासून कायमस्वरूपी तोडगा काढत अशा उपद्रवी रानटी प्राण्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा व आमची झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त काजू बागायतदार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
