मालवण दि प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत आचरा मॅनेजमेंट स्टडीज आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास’ शिबीराचा वायंगणी तळेवाडी (ता. मालवण) येथे सोमवारपासून प्रारंभ झाला. या शिबीराची १५ जानेवारी रोजी सांगता होणार आहे.
प्रगतीची नवीन क्षितीजे पादाक्रांत करताना महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाच्या सुख-दुःखाचीही जपणूक करावी व स्वत:च्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजाच्या आशा आकांक्षांनाही सत्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे, यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा प्रबोधन व दिशादर्शन करणे, नेतृत्व गुणाना संधी देणे, श्रमसंस्कारातून आरोग्याचे महत्व सांगणे, सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करणे, जलसंवर्धन व पर्यावरण याबद्दल जाणीव निर्माण करणे, ग्रामीण जीवनाच्या समस्या व उपाययोजनांबद्दल चर्चा करणे, बालसंस्कार, आरोग्य यांचा प्रसार करणे आदी उद्दिष्ट्ये या शिबिराच्या केंद्रस्थानी आहेत.
ग्रामस्वच्छता आणि रस्ते डागडुजी, पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण, युवा पालक मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक वारसा व दुर्लक्षित पर्यटन आदी प्रकल्पकार्ये शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहेत. शिबिरात मोबाईलच्या युगात वाचनाचे महत्व, युवकांचे राष्ट्रीय सेवेतील महत्व, आकाश दर्शन, युवकांचे आरोग्य, पर्यटन व्यवस्थापन आदी विषयांवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
