डॉ.राजश्री साळुंखे;वागदे येथे विशेष निवासी संस्था शिबिराचे उद्घाटन
⚡कणकवली ता.२२-: युवा पिढीने आप्पासाहेब पटवर्धन, केशवराव राणे यासारख्या लोकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी कार्य करावे. शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचल्यानंतर सुद्धा आपल्या जन्मभूमीशी नाळ जोडलेली असणे आवश्यक आहे. देशाच्या प्रगतीमध्ये युवा नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे, असे मत डॉ. राजश्री साळुंखे, चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यांनी व्यक्त केले.
कणकवली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सौ. डॉ. साळुंखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या
कार्यक्रम प्रसंगी वागदे गावचे सरपंच रुपेश आमडोसकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, पोलीस निरीक्षक श्री. खंडागळे , गोपुरी आश्रम अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, संचालक विनायक मेस्त्री, सदाशिव राणे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, प्रा. युवराज महालिंगे, प्रा. मंगलदास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य चौगुले म्हणाले की , श्रमसंस्कार शिबिर व्यक्तिमत्व विकासासाठी एक संधी आहे. NSS च्या माध्यमातून ध्येयवेड्या व्यक्तींना व्यासपीठ मिळते, त्यातून त्यांची जडणघडण होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रुपेश आमडोसकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना मार्फत वागदे ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामांचे कौतुक केले. कार्यक्रमप्रसंगी श्री. खंडागळे, श्री. मेस्त्री, प्रा. महालिंगे, प्रा. मुंबरकर, प्रा. कांबळे यांनी शिबिरार्थींना शिबिर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षदा कुबल व कु. मनीष कलिंगण यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश पाटील यांनी केले. सदर शिबिर २१ ते २७ या कालावधीत होत आहे. या ७ दिवसीय शिबिरामध्ये डॉ. प्रसाद देवधर, श्री. प्रवीण सुलोकार, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. रुपेश पाटकर, दत्तात्रेय तवटे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग १६० स्वयंसेवक उपस्थित राहतील. शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे, प्रा. विनया रासम, प्रा. आदिती मालपेकर यांनी प्राचार्यराजेंद्र कुमार चौगुले, सर्व पदाधिकारी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रा. विनया रासम यांनी केले.
