जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक; टोल परिसरात बॅनरबाजी
⚡कणकवली ता.१४-: आमचो जिल्हो … रस्तो आमचो… टोल वसुली केलात.. तर दाखवू रस्तो घरचो..! अशी बॅनरबाजी करीत शिवसेनेने
टोलमुक्तीचा लढा सुरू केला असून जर टोल वसुली सुरू केली तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर दिला आहे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-ओसरगाव येथे असलेल्या टोल नाक्यावर टोल वसुलीचा घाट घातला जात आहे. जिल्ह्यात महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुलीचा भुर्दंड सिंधुदुर्गातील वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने टोलमुक्तीचा लढा सुरू केला असून जर टोल वसुली सुरू केली तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर दिला आहे. तर तशी बॅनरबाजी सुद्धा टोल परिसरात करण्यात आली आहे.
ओसरगाव टोल वसुलीचे काम जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने घेतले असून त्यामुळे ओसरगाव टोलनाक्यावरून वसुली करण्याची धावपळ या बड्या नेत्यांकडून होताना दिसत आहे. सिंधुदुर्गातील वाहन चालकांना टोल मुक्ती मिळावी यासाठी जिल्ह्यातील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून ओसरगाव टोल नाक्याच्या परिसरामध्ये शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील वाहन चालकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत ,शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत टोल संदर्भात आपली भूमिका यांनी जाहीर केली आहे.
