मानसोपचार तज्ञ मीनाक्षी यांचे प्रतिपादन
⚡बांदा ता.१२-: “बदलत्या आधुनिक जगात माणसांचे प्रश्न बदलत आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य आनंददायी असणे काळाची गरज आहे. बदलती जीवनशैली माणसाला आपले वर्तन, भावना बदलायला भाग पडते आहे. मनाचं शास्त्र जाणून आजच्या काळाला आजच्या माणसाने सामोरे जाण्याची नितांत गरज आहे. काळाचे पडसाद तुम्हाला ऐकावे लागतील. आपल्या मनातले प्रश्न आपणच कसे सोडवता येतील त्यादृष्टीने जगण्याची शैली बदलायला हवी” असे प्रतिपादन जेष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व ‘सहज ट्रस्ट’, गाळेल, बांदाच्या अध्यक्षा ,मीनाक्षी यांनी येथे केले.
येथील गोगटे वाळके कॉलेज, बांदाच्या महिला विकास कक्ष यांच्यावतीने आयोजित केलेल्या “सामाजिक मानसिक आरोग्य” या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एन.डी. कार्वेकर हे होते.
यावेळी मीनाक्षी यांनी मानसिक आरोग्याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर मांडणी केली. त्या पुढे म्हणाल्या की, “ मानसिक वर्तनात त्या-त्या कुटुंबाचा, समाजाचा मोठा वाटा असतो. नैराश्य झटकून नव्या उमेदीने सकारात्मक कार्य करण्याची आवश्यकता प्रत्येक माणसाला हवी. जगण्याचे प्रश्न जरी बदलले तरी मानवी मुल्यांची जोपासना करणे व वृद्धिंगत करणे ही काळाची गरज ठरते आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महिला विकासकक्षाच्या समन्वयक प्रा. सौ.रश्मी काजरेकर यांनी केले. यावेळी काजरेकर म्हणाल्या कि, “ महिलांच्या उन्नतीसाठी हा महिला विकास कक्ष आहे. विविध उपक्रमातून विद्यार्थीनीना प्रत्येक गोष्टीत सजग करण्याचे कार्य हा विभाग करतो. सामाजिक प्रश्नांना हाताळण्याचा कसोशीने हा विभाग प्रयत्न करत असतो.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. एन.डी. कार्वेकर म्हणाले की, “ सामाजिक मानसिक आरोग्य सुदृढ राहणे ही त्या-त्या समाजाची खरी संपत्ती आहे. हे सुदृढपण समाजाला निकोप बनविते. आनंददायी समाजाची निर्मिती यासाठी हे सामाजिक आरोग्य टिकले पाहिजे.”
कार्यक्रमाचे आभार महिला विकासकक्षाच्या सदस्या सौ. सुप्रिया नातू-आपटे यांनी व्यक्त केले व सूत्रसंचालन प्रा. अनिल शिर्के यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
