वॉटर ए टी एम च्या नावाखाली जनतेच्या पैशाचा चुराडा; सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यांचा आरोप
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत लाखो रुपये खर्च करुन शहरामध्ये शुद्ध पाण्यासाठी स्वच्छ भारत स्वच्छ जल अंतर्गत बसविलेल्या वॉटर एटीएम मशीन काही दिवसातच बंद पडल्या आहेत. त्यामुळे वॉटर एटीएम मशीन नेमके कोणाच्या फायद्यासाठी बसविलेले होते? असा प्रश्न वेंगुर्लावासीयांना पडला आहे. या वॉटर एटीएम मशिनच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा चुराडा केल्या असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे.
शहरातील लोकांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने नगरपरिषदेने ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करुन वॉटर एटीएम बसविले आहेत. हे वॉटर एटीएम काही दिवसांतच बंद पडल्याने वेंगुर्लावासीयांना शुद्ध पाणी देण्याचा हेतुच अशुद्ध झाला. त्यामुळे हे वॉटर एटीएम मशीन नेमके कोणाच्या फायद्यासाठी बसवले होते तसेच ज्या कंपनीकडून या वॉटर एटीएम खरेदी केल्या त्या कंपनीवर नगरपरिषदेने कोणती कार्यवाही केली याचे उत्तर नगरपरिषदेने देणे अपेक्षित आहे. ज्या कंपनीकडून व ठेकेदाराकडून या वॉटर एटीएम मशीन खरेदी करण्यात आल्या त्यांच्यावर आणि या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असणा-यांवर नगरपरिषदेने तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी आणि तसे न केल्यास त्याचे गंभीर परिणाम संबंधितांना भोगावे लागतील असा इशाराही अॅड.सातार्डेकर यांनी दिला आहे.
