मडुऱ्यातील शेतकऱ्यांचा आरोप : शेती करणे बनले धोकादायक
बांदा ता.०१-:* जीवन प्राधिकरण कंपनीने शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी वा नुकसान भरपाईची लेखी हमी न देता मडुरा-रेडकरवाडी येथील शेतातून पाईपलाईनसाठी खोदाई केली. पावसाळ्यात ट्रॅक्टर किंवा जनावरे खोदाई केलेल्या चरात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कुठलाही अपघातात झाल्यास आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल शेतकरी पिंट्या उर्फ प्रवीण परब यांनी प्रशासनास केला आहे.
मडुरा-रेडकरवाडी येथे शेत जमिनीतून जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. कंपनी अधिकारी व ठेकेदार तसेच सुपरवायझर आणि शेतकऱ्यांची झालेल्या बैठकीत सरपंच व अधिकारी यांच्या समक्ष आम्हाला नुकसान भरपाईचे लेखी पत्र दिल्यानंतरच काम सुरू करा असे ठरले होते. परंतु त्याप्रमाणे काहीही न करता अन्य विभागांना पत्रव्यवहार करत मनमानी काम सुरू केले असे शेतकरी पिंट्या परब यांनी सांगितले.
शेत नांगरणीसाठी ट्रॅक्टर कुठून आणि कसा नेणार ते पाईपलाईन कामास परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांनी वा लोकप्रतिनिधी सांगावे. अन्यथा यावर्षी आमची शेती त्यांनीच पिकवून आम्हाला द्यावी असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच कोणताही मनमानी कारभार मडुरा गावात खपवून घेणार नसल्याचे पिंट्या परब यांनी सांगितले.
अधिकारी व लोकप्रतिनिधीची अशा कामात मिलीभगत असल्याचा आरोप श्री परब यांनी केला. दरम्यान, सुपरवायझर अभय कापरे म्हणाले की, पाईपलाईन चराच्या दोन्ही बाजूने दहा मीटर होणारे नुकसान आम्ही नंतर भरून देऊ. तर सरपंच साक्षी तोरसकर यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.
