कणकवलीत ” मराठी” चा जागर; डॉ. महेश केळुसकर यांची मुलाखत आणि कवी संमेलन
कणकवली ता.२४-:* स्वामीराज प्रकाशन या संस्थे तर्फे दर महिन्याच्या २७ तारखेला ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत २७ एप्रिल रोजी कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मराठीचा जागर होणार आहे.
प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. मी मालवणी…मी मराठी असे सांगणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुस्कर यांच्याशी नीलेश पवार मुक्त संवाद साधतील. ‘ बोलीभाषेचे मराठीवर अतिक्रमण होते आहे का? ‘ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल. विलास खानोलकर, कमलेश गोसावी, डॉ. सई लळीत, श्रेयस शिंदे आणि डॉ. सतीश पवार यांचे काव्य संमेलन.निकेत पावसकर यांच्या पत्र संग्रहातील काही खास ” मराठी ” पत्रांचे प्रदर्शन.असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. पल्लवी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर या कार्यक्रमाला खास उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे आणि वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नानू देसाई यांनी केले आहे.
