कणकवली ता.२३-:* राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील २५० बस स्थानके, उपस्थानके येथे अस्तित्वात असलेले भारत दूर संचार निगमचे लॅण्डलाईन दूरध्वनी बहुसंख्येने बंद झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक माहिती मिळत नाही. तरी महामंडळाने आता अशा ठिकाणी अधिकारी, वाहतूक निरीक्षक आदींना मोबाईल संचासह बदलता न येणारा एकच भ्रमणध्वनी नंबर कायम स्वरुपी देण्यात यावा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी केली आहे. प्रसिध्दी पत्रकाद्वारे चव्हाण यांनी ही मागणी केली आहे. राज्यातील मुंबई सेंट्रल या मध्यवर्ती बस स्थानकासह मुंबई परिसरातील, तसेच राज्यातील २५० बस स्थानकांतील, उपबसस्थानके या ठिकाणातील भारत दूर संचार निगमचे बहुसंख्य लॅण्डलाईन दूरध्वनी कालौघात बंद झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक माहिती मिळत नाही.
प्रवाशांना स्थानकांत येऊन माहिती घ्यावी लागत आहे. त्याचा त्रासही सहन करावा लागत आहे, असे चव्हाण यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. लॅण्डलाईनचा जमाना संपत आल्याने महावितरण कंपनीने त्यांच्या अधिकाऱ्यांसह अभियंता, लाईनमन आदींना स्वतंत्रपणे मोबाईल संचासह भ्रमरध्वनी नंबर दिले आहेत. कर्मचार्यांची बदली झाली तरी नव्याने त्या पदावर येणार्याला तोच नंबर दिला जातो. त्यामुळे वीज ग्राहकांना अडचण येत नाही, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी एस.टी. महामंडळाने तातडीने हिच पद्धत अंमलात आणण्याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होईल. प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल.
