*💫मालवण दि.१३-:* मसुरे परिसरात सध्या माकडांचा त्रास वाढला असून जंगलातून मानवी वस्तीत घुसणाऱ्या या माकडांकडून शेती व बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने आंबा व काजु बागायतदार संकटात असतानाच माकडांच्या संचाराने पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी व बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. वनविभागाने याबाबत उपाय योजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. मसुरे भागात सध्या कुळीथ, पावटा या पिकांना फुलोरा आला असून दुपारच्या वेळी झुंडीने येणारी माकडे कोवळा पाला तसेच रोपे मुळातुन उखडुन टाकत आहेत. तसेच माड बागायतीचे सुद्धा नुकसान करत आहेत. येथील कावावाडी, गडघेरावाडी येथील शेतकरी त्रासले आहेत. मसुरे मर्डेवाडी भागात सुद्धा अनेक माकडे येत असल्याने ग्रामस्थांची घरे, शेती तसेच फुलझाडे व फळ बागायतीचे नुकसान होत आहे. मेहनत घेऊन केलेल्या शेतीची मोठ्या प्रमाणात नासधुस होत असल्याचे उघड्या डोळयानी पाहण्या पलीकडे इतर कोणताही पर्याय शेतकऱ्यां समोर सध्या तरी नाही आहे. मसुरेसह भगवंतगड, बांदिवडे या गावात सुद्धा मर्कट लिलानी ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले असुन वन विभागाने तातडीने ऊपाय योजना करण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थ यांनी केली आहे.
माकडांच्या संचाराने मसुरे परिसरात पिकांचे नुकसान…
