कोकण भूमी प्रतिष्ठान तर्फे ठाणे येथे सन्मान..
मालवण ता.२९-:* कोकण भूमीचा पर्यटनातून सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय मी निश्चित केलेले आहे. कोकणामध्ये कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मोठा वाव असून संपूर्ण कोकण मधील कृषी क्षेत्राच्या माध्यमातून येथील सर्वांगीण विकास आणि येथील शेतकऱ्यांना नेहमी पुढे आणण्याचा आपला प्रयत्न राहील. देश विदेशातही येथील आंब्याला नावलौकिक मिळवून देण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन मुंबई येथे कोकण आयडॉल पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कारास उत्तर देताना मसुरे सुपुत्र डॉ. दीपक परब यांनी सांगितले.
कोकण भूमी प्रतिष्ठान, समृद्ध कोकण प्रदेश संघटनेने राज्यातील कोकण भागात जनतेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व देशात नावलौकिक मिळविलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ग्लोबल कोकण उद्योग परिषदेत कोकण आयडॉल पुरस्काराने मुंबई ठाणे येथील कार्यक्रमात सन्मान केला. मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक डॉ श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना यावेळी कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, पितांबरी प्रोडूसर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष रविंद्र प्रभुदेसाई, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, किसान कनेक्ट चे अध्यक्ष सारंग निर्मळ, सिडकोचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत संघवी, कोकण सृष्टी चे संचालक दिलीप शिर्के, पुनीत गौरवचे संचालक गौतम प्रधान, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, कोकणभूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकण चे संस्थापक संजय यादवराव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, युवा वकील ओवेस पेचकर, चंद्रशेखर फाटक, रामचंद्र सावे, विनायक महाजन, गजानन शेटे, अरविंद अमृते, परीश्रीतजि प्रभुदेसाई, मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.. उद्योजक दीपक परब यांनी संपूर्ण राज्यांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध नियोजन बद्द यशस्वी कार्य केल्याबद्दल आणि कोकणच्या पर्यटनात्मक विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर दीपक परब यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. दीपक परब यांनी संपूर्ण कोकणामध्ये अत्याधुनिक कृषी क्षेत्राच्या माध्यमातून प्रगती करण्यासाठी विविध उपक्रम ठिकठिकाणी राबविलेले आहेत. येथील आंब्याला देश-विदेशात नाव मिळवून देण्यासाठी ही त्यांचा मोठा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. दीपक परब यांना आजतागायत विविध राज्यस्तरीय देश विदेशातही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तसेच कोकणातील गोरगरीब जनतेला ते नेहमीच सर्व प्रकारची मदत देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोर गरिबांचे कनवाळू व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या कार्याला चालना देण्यासाठी यावेळी सर्वांनी सभागृहात उभे राहून टाळ्या वाजवून गौरवास्पद कामाबाबत मानवंदना दिली ही बाब समस्त मसुरे वासी यांसाठी अभिमानाची ठरली आहे.
