सावंतवाडी ता.२५-: लहान लहान प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा शाश्वत विकास करू शकतात. मुंबईसारख्या शहरातून नोकरी न करता तळवडे गावात येऊन शेळीपालन प्रशिक्षण केंद्र उभारणाऱ्या सुमीत भोसले याच्याबद्दल समाधान आहे. असे शेकडो सुमीत तयार झाल्यास तळवडे हे सिंधुदुर्ग जिह्याचे शेळीपालन प्रशिक्षण केंद्र व कृत्रिम गर्भरेतन सेंटर होऊ शकते. तसेच ज्या पद्धतीने हे प्रयोग सुरू आहेत त्यापद्धतीने पाहिल्यास सदर उपक्रम जिल्ह्याला नव्हे तर राज्याला एक मॉडेल बनू शकते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. तळवडे येथे प्रिसिजन फाऊंडेशन सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भगीरथ प्रतिष्ठान झाराप व कॅलिफोर्निया-३० फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेळीपालन प्रशिक्षण व कृत्रिम गर्भ रेतन केंद्राचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँक संचालक विद्या परब, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, प्रिसिजन फाऊंडेशन सोलापूरचे माधव देशपांडे, स्नेहा सकपाळ, पुण्याचे संतोष बाम, मधुरा बाम, शेळी कृत्रिम रेतन प्रशिक्षक फलटणचे डॉ.दीपक अहिवले, प्रगतिरथ प्रतिष्ठान झारापचे डॉ.प्रसाद देवधर, कॅलिफोर्निया-३० फार्मचे सुमीत भोसले, बँक विकास अधिकारी विलास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सुमित भोसले यांनी बनविलेले सेंद्रिय खत देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा बँक अध्यक्ष श्री दळवी पुढे म्हणाले की, गाई-म्हैशी अशा दुधाळ जनावरांबरोबर आपण शेळी पालनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गरिबाची गाय म्हणून शेळी कडे पाहिले जाते. हिच दोन धोरणे जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. यासाठी योग्य फाऊंडेशन बनणे आवश्यक आहे तरच असे प्रयोग यशस्वी होणार. अशा सर्व प्रयोगांमध्ये जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या सदैव पाठिशी आहे, असे श्री. दळवी यांनी सांगितले. अतुल काळसेकर, डॉ.दीपक अहिवले, माधव देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रसाद देवधर यांनी करताना रोजगरात्मक उपक्रम जिल्हा बँकेसमोर मांडले. प्रास्ताविक सुमित भोसले यांनी करत संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. आभार श्री. भोसले यांनी मानले.
भगीरथ प्रतिष्ठान दिशा देण्याचे कार्य करते
जिल्हा बँकेला शेतकऱ्यांना कायम मदत करायची आहे. परंतु त्यांचे सिलेक्शन, त्यांना प्रशिक्षण देणे अशी यंत्रणा भगीरथ प्रतिष्ठान तसेच कॅलिफोर्निया-30 करत असेल तर आमच्यासाठी तो एक सहकार्याचा हात आहे. असे शेकडो हात जिल्हा बँकेचे तयार व्हावेत यासाठी आम्ही नवीन धोरण अमलात आणत असल्याची ग्वाही अध्यक्ष यांनी दिली. भगीरथ प्रतिष्ठानने वेळोवेळी आम्हाला दिशा देण्याचे कार्य केले असल्याने जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय वाढत असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.
