दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* सुरवातीची काही वर्ष अतोनात मेहनत करून उभी केलेली काजूबाग काल पडलेल्या वणव्यात जळुन खाक झाल्याने मणेरी गौतमवाडी येथील शेतकऱ्यांचे सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मणेरी येथील एकनाथ नाईक ,राजन नाईक तसेच कृष्णा नाईक यांची मणेरी गौतमवाडी येथे पाचशे पेक्षा जास्त काजु कलमांची बाग आहे.या बागेत काल अचानक दुपारच्यावेळी आग लागली.ही आग एवढी भयंकर होती.की गेली पाच वर्षे मशागत केलेली व सध्या ऐन बहरात आलेली काजू कलमे जळुन खाक झाली. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज कृषी अधिकारी श्री.कोळी, मणेरी गावचे सरपंच विशांत तळवडेकर, तसेच तलाठी, ग्रामसेवक यान्नी प्रत्यक्ष घटनास्थळी जात पंचनामा केला.यावेळी या तिन्ही शेतकऱ्यांचे एकूण मिळुन सहा लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आल्याचे शेतकरी एकनाथ नाईक यांनी सांगितले.
