*⚡बांदा ता.०५-: पाडलोस-केणीवाडा येथे पहाटेच गव्यानी आपला मोर्चा वायंगणी शेतीत वळवला. गवा आल्याची भनक लागताच शेतकरी एकनाथ नाईक यांनी सुमारे पंधरा मिनिटे थाळी वाजवून त्याला हाकलले. परंतु तोपर्यंत गव्याने पूर्ण शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शासनाकडून आम्हाला नुकसानभरपाई नको परंतु आमच्या शेती-बागायतीचे तरी अशा उपद्रवी रानटी प्राण्यांपासून संरक्षण करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदा वायंगणी शेती मोठ्या प्रमाणात केली. परंतु गवारेडा सारख्या वन्यप्राण्यांनी वायंगणी शेतीचे नुकसान केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतात बुजगावणे उभे करणे, आग पेटत ठेवणे, माचोळी करून शेत राखत बसणे असे अनेक प्रयोग शेतकरी वायंगणी शेती वाचविण्यासाठी करत आहेत. दांडेली-वरचावाडा येथील संजय नाईक यांच्यादेखील एक महिन्याच्या वायंगणी शेतीचे गव्यांनी नुकसान केले. त्यामुळे निदान आता उरलीसुरली शेती तरी वाचवा अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली आहे.
