ओरसगांवचे माजी उपसरपंच बबली राणे यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश
*⚡कणकवली ता.२७-:* ओसरगांव तलावातील गाळ काढण्यासाठी व तलाव परिसराचे सुभोभिकरण कण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ओसरगांव येथे तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेल्याने पाणी गढूळ झाले आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याशिवाय तलावाच्या सभोवताली असलेली संरक्षक भिंत देखील ढासाळली आहे. त्यामुळे तलावातील गाळ काढणे, संरक्षक भिंत बांधणे, पाण्याची गळती थांबवणे ही कामे तातडीने होणे आवश्यक असून पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने ओसरगांव तलावातील गाळ काढून परिसराचे सुभोभिकरणासाठी अत्यंत गरजेचे असल्याने या कामासाठी आपण निधी मंजूर करावा, अशी विनंती श्री. राऊत यांनी आदित्य ठाकरे यांना केली आहे. दरम्यान, ओरसगांवचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी तलावातील गाळ काढण्यासाठी व परिसराचे सुशोभिकरणासाठी सातत्याने लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरवठा केला होता. त्यांच्या या पाठपुरवठ्याला यश आले आहे.
