भाजप मंत्री पुत्राला त्वरीत अटक न झाल्यास काँग्रेसतर्फे जिल्ह्यात आंदोलन

इर्शाद शेख यांची माहिती

*⚡वेंगुर्ला ता.०९-:* शेतक-यांच्या काँग्रेस प्रेमाबद्दल भाजपला टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशात कुळ कायदा लागू करुन ‘कसेल त्याची जमीन‘ या न्यायाने देशातील गरीब शेतमजूरांना शेतजमिनीचे मालक बनविले त्या काँग्रेस पक्षाच्या शेतकरी प्रमावर टिका करणे ही भाजपच्या नेत्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. शेतक-यांना गाडीखाली चिरडून मारणा-या मंत्री पुत्राच्या कथीत कृत्याविषयी भाजपला कोणतीही लाज वाटत नसून देशाचे पंतप्रधानही असंवेदनशील झाले आहेत. त्यामुळे शेतक-यांना देशोधडीस लावणा-या भाजप पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यास काँग्रेसवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. उलट भाजपने केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेवून त्यांच्या पुत्रास त्वरीत अटक करावी अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांनी केली आहे. मृत शेतक-यांच्या कुटुंबाचे अश्रु पुसण्यासाठी जाणा-या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर भाजप टिका करत आहेत. काँग्रेस कायमच दिनदुबळ्या गोरगरिब जनतेच्या सुख दुःखात सामील होऊन पिडितांचे अश्रू पुसण्याचे काम करत आली आहे आणि हीच काँग्रेसची संस्कृती आहे आणि या पुढेही काँग्रेस पक्ष हे करीत राहील. क्रिकेटपटू शिखर धवनच्या अंगठयाला दुखापत झाली व तो वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकणार नाही म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त करणारे आपले संवेदनशील पंतप्रधान लखीमपुर खेरीपासून १०० किलोमीटरवर उत्सव साजरा करण्यासाठी येतात. परंतू त्यांना या पिडित कुटुंबाना भेटायला वेळ नाही किंवा त्या मृत शेतक-यांविषयी सहवेदना सुद्धा व्यक्त करत नाहीत हे या देशाचे दुर्दैव आहे. भाजप मंत्री पुत्राला त्वरीत अटक न झाल्यास काँग्रेस जिल्ह्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आंदोलनं करेल असेही इर्शाद शेख यांनी म्हटले केले आहे.

You cannot copy content of this page