*⚡मालवण दि.२९-:* जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बेकायदेशीर जमाव करून गर्दी जमवत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर आचरा व मालवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मालवण, आचरा, चौके, कट्टा येथील भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आचरा येथे बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच प्रणया टेमकर, संतोष कोदे, दीपक सुर्वे, राजू परुळेकर, जेरॉन फर्नांडिस वगैरे २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण अधिक तपास करत आहेत. मालवण भरड नाका, चौके व कट्टा या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बेकायदेशीर गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सुदेश आचरेकर, संदीप उर्फ बाबा परब, विजय केनवडेकर, चंद्रशेखर उर्फ गणेश कुशे, परशुराम उर्फ आप्पा लुडबे, अशोक सावंत, दत्ता सामंत, राजन गावडे, सतीश वाईरकर, आशिष हडकर यासह ३० ते ४० जणांवर कलम १४३, ३७ (१ ), १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील करत आहेत.
मनाई आदेश भंग प्रकरणी मालवणातील भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
