पत्रादेवी लाठी हटविल्याने पुकारण्यात आलेले आंदोलन मागे

बांदा सरपंच अक्रम खान यांची माहिती : जिल्हा पोलीस अधिक्षकांचे मानले आभार

*⚡बांदा दि.३०-:* पत्रादेवी येथील जुन्या महामार्गावरील पोलीस लाठी हटविण्यासाठी उद्या शनिवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर लाठी आजच हटविण्यात येत असल्याचे फोनवरून सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आज प्रत्यक्षात लाठी हटविण्यात आल्याने उद्याचे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे बांदा सरपंच अक्रम खान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमी महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमा अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रभाव आता कमी होत आहे. गोवा राज्यात रोजगारासाठी सिंधुदुर्गातून सुमारे २० हजारहून अधिक युवक – युवती रोज येजा करतात. मात्र सीमेवरील निर्बंधामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. काहीजण प्रसंगी चोर मार्गाचा अवलंब करुन नोकरीसाठी जात होते. गाळेल येथे दरड दुर्घटनेत युवकाचा गेलेला बळी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
सीमेवरील निर्बंधांबाबत जिल्ह्यातील स्थानिकांच्या आपल्याकडे भरपूर तक्रारी प्राप्त होत्या. त्यानुसार आ. नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या कानावर समस्या घातली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पोलीस लाठी हटविण्यासाठी निवेदन दिले. आज शुक्रवार पर्यंत लाठी न हटविल्यास शनिवारी सकाळपासून गोव्यात जाणार्‍या अत्यावश्यक सेवेसह सर्व वाहतूक रोखण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी शुक्रवारी सकाळी लाठी हटविण्यात येत असून शनिवारचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. आज प्रत्यक्षात लाठी हटविण्यात आल्याने उद्याचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात येत आहे. मात्र, पुन्हा पोलीस लाठी घातल्यास आंदोलन छेडण्यात येईल असे कळविले आहे.

You cannot copy content of this page