अमित इब्रामपूरकर यांची आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका_
*💫मालवण दि.२६-:* कणकवलीच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयात आमदार वैभव नाईक यांचा थयथयाट कशासाठी होता? ठेकेदारांसाठी आणि टेंडर मधून मलिदा खाण्यासाठी केला असेल तर तसाच थयथयाट जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी,आरोग्य साधन-सामुग्रीसाठी आणि कुडाळचे महिला-बाल रुग्णालय लवकर सुरु करण्यासाठी केला असता तर आज पर्यंत मतदार संघातील अनेकांचे कोविडमुळे गेलेले जीव वाचले असते तसेच चक्रीवादळ झाल्यानंतर लगेच नुकसान भरपाई मिळावी यासाठी अशीच एनर्जी वापरली असती तर जनतेने आशीर्वादही दिले असते अशी बोचरी टीका मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे. चांगले रस्ते आमदार बनवू शकत नाहीत.आमदारांच्या गेल्या ५ वर्षाच्या व आताच्या २ वर्षाच्या कार्यकाळात कोणतेही रस्ते टिकले नाहीत.चौके-धामापूर-कुडाळ रस्ताही खड्डेमय आहे.या रस्त्यासाठी मालवण मनसे पदाधिकाऱ्यांनी मुंडण आंदोलनही केले होते. आज जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था पुर्णपणे बिघडली आहे.राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्युदर सर्वाधिक २.६ वर गेला आहे.तर आजपर्यंत कुडाळ-मालवण मतदार संघात १९९ तर जिल्ह्यात ६२८ जणांना कोविडमुळे जीव गमवावा लागला आहे.ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर बेडची मोठी कमतरता असताना ऑक्सिजनशिवाय जनतेला जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाची भयाण अवस्था असताना आ.वैभव नाईक १३० कोटींच्या रस्त्यांच्या टेंडरसाठी बांधकाम कार्यालयात जातात तेथे असलेल्या अधीक्षक अभियंता यांना निष्काळजीपणामुळे वेळेत निविदा प्रक्रिया न झाल्याने कामे रखडली आहेत,अधिकाऱ्यांकडून वर्कऑर्डर वेळेवर दिली जात नाही, काम करणाऱ्या ठेकेदारांना अडचणी निर्माण केल्या जातात असे सांगत थयथयाट करतात.म्हणजेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी ऐकत नाहीत आता बांधकाम खात्यातील अधिकारीही आमदारांना जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे.लोकप्रतिनिधींच्या बेताल वागण्यामुळे,निष्क्रियतेमुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाल्याचा आरोपही इब्रामपूरकर यांनी केला आहे.
