⚡कणकवली ता.२४-:
हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने कणकवली शहरात आगामी बुधवारी, २९ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या ऐतिहासिक घटनेनंतर हिंदू समाजासमोर असलेल्या नवीन आव्हानांचा विचार करण्यासाठी आणि समाजाला अधिक सशक्त व सुसंघटित करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे,
संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. अभय जगताप (संयोजक, शिवशंभू विचार मंच, कोकण प्रांत) उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सकल हिंदू संमेलन समितीचे श्री. विजय गांवकर (संयोजक) आणि श्री. हरिश गणपत्ये (सहसंयोजक) काम पाहत आहेत.
हिंदू समाजाने ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर राम मंदिर उभारणीचे स्वप्न साकार होताना पाहिले आहे. आता याच धर्तीवर समाजात एकता आणि सुसूत्रता निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक हिंदू बांधव आणि भगिनींनी आपल्या कुटुंबासह या धर्मकार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन ‘सकल हिंदू समाज, कणकवली’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
