कोकणच्या निसर्गाशी एकरूप झालेल्या कवितेच प्रतिबिंब “बकुळीची फुले” काव्यसंग्रहात ..

⚡सावंतवाडी ता.३०- : कविता लिहिणं ही वाटतं तेवढी सोप्पी गोष्ट नाही. शब्दांना आपल्या मुठीत पकडण्याचं काम कवी करतो. सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याच प्रतिबिंब ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहात दिसून येते‌. आजच्या छंदमुक्त कवितेच्या वातावरणात वृत्तबद्ध काव्य लिहिणाऱ्या कवी दीपक पटेकर यांचा गौरव करायला हवा, असे गौरवोद्गार माजी प्राचार्य एच. व्ही. देशपांडे यांनी काढले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

श्री‌. देशपांडे म्हणाले, सावंतवाडीशी माझं वेगळं नातं आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी.एन. नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, ना.शि.परब, शशिकांत निखार्गे, दादा मडकर्ईकर, आ.द. राणे, विद्यार्थी महेश केळुसकर आदींसह मी या भूमीत काम केलं. एस.पी. के. महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करतानाच्या १७ वर्षांच्या आठवणी आजही स्मरणात आहेत. कवी वसंत सावंत यांनी मला निसर्ग वाचायला शिकवला. जगाच्या इतिहासात काव्य हे पहिलं लिहिलं गेलं असून कवितेचा अन् मानवी जीवनाचा संबंध दृढ आहे. आज जुन्या कवींच्या खांद्यावर उभे राहून नवे कवी जग पाहत आहेत. मात्र, मुक्तछंदच्या नावावर छंदमुक्त कविता लिहिली जात आहे. यात वृत्तबद्ध काव्य लिहिणाऱ्या कवी पटेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांचे लेखन साहित्य अकादमीसाठी पात्र असून त्या दृष्टीने भविष्यात त्यांनी वाटचाल करावी अशा शुभेच्छा डॉ. देशपांडे यांनी दिल्या.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाचे प्रकाशन येथील कवीवर्य केशवसुत कट्टयावर मोठ्या दिमाखात संपन्न झाले. साहित्यिक, माजी प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते व मालवणी कवी विनय सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ साहित्यिका सौ. उषा परब, कवी दीपक पटेकर, भरत गावडे, अनिल भोसले, पटेकर कुटुंबीय आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत व परिचय भरत गावडे यांनी करून दिला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.जी. ए. बुवा यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते मालवणी कवी विनय सौदागर यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन गौरव केला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचे पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कवयित्री सौ. स्नेहा नारिंगणेकर यांनी काव्यसंग्रहावर भाष्य केले‌. तर कवयित्री सौ‌. आदिती मसुरकर यांनी कवितांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना कवी दीपक पटेकर प्रकाशन सोहळ्यास जमलेल्या गर्दीसमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी पुस्तक निर्मितीसाठी प्रेरणा देणारे आपले वडील, काव्यगुरू विजय जोशी (विजो), प्रेरणास्थान मार्गदर्शक जी. ए. बुवा, पुस्तक निर्मितीसाठी मदत करणारी आपली बहीण अपर्णा जाधव, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कोमसाप शाखेच्या सहकाऱ्यांना धधन्यवाद दिले. मुक्तच्छंद कवितेकडून वृत्तबद्ध कवितांकडे कसा वळलो हे सांगून त्यांनी पुस्तकाचा संपूर्ण प्रवास वर्णन केला.

दीपींकडे यमकांची विपुलता : कवी विनय सौदागर
पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष कवी विनय सौदागर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. साहित्यात कवितेला महत्त्व असून गद्य लेखनापेक्षा अंतरी असणारे भाव कवी थेट कवितेतून मांडू शकतो. दीपक पटेकर यांच्यातील कवी आम्ही अनुभवला आहे. सोप्या शब्दात कवितेची मांडणी त्यांनी केली आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद कवितेत आहे. यमकांची विपुलता कवी पटेकर यांच्या लेखनात असून त्यांच्यात एक गीतकार दडलेला आहे. निसर्ग, प्रेमासह सामाजिक जाणीवांवर भाष्य करणारी काव्य त्यांनी लिहिली आहेत. पुस्तकातील त्यांचे मनोगत देखील काव्यात्मक आहे. त्यांच्या कवितांवरचा “कवितेचा दीपक” हा कार्यक्रम यापूर्वीच घेऊन आम्ही त्यांचा सन्मान केला आहे.

याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्यांकडून कवी दीपक पटेकर (दीपी) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, निवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, साहित्यिक अनंत वैद्य, संतोष वालावलकर, रमेश बोंद्रे, ॲड. संतोष सावंत, ॲड. नकुल पार्सेकर, कल्पना बांदेकर, ॲड. अरूण पणदुरकर, प्रा. सुभाष गोवेकर, सतीश पाटणकर, अभय नेवगी, अभिमन्यू लोंढे, किशोर वालावलकर, म. ल. देसाई, सुरेश पवार, डॉ. दीपक तुपकर, अनिल भोसले, एकनाथ कांबळे, मुकूंद वझे, श्री. भाट, प्रा. सुरेश म्हसकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, मधुकर मातोंडकर, दिलीप भाईप, विनायक पराडकर, जितू पंडित, विठ्ठल कदम, प्रदीप प्रियोळकर, संदीप सावंत, व्ही.के.सावंत, वैशाली सावंत, डॉ.सुनील परब, आदिती मसुरकर, धोंडी मसुरकर, स्नेहा नारिंगणेकर, धोंडू नारिंगणेकर, प्रितम तिवरेकर, वैभवी हरमलकर, , राजा घाटे, रवी जाधव, प्रा‌.रूपेश पाटील, प्रा. केदार म्हसकर, कल्पना बोडके, साबाजी परब, राजेश नाईक, प्रा. गोडकर, प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, बाळकृष्ण राणे, रामदास पारकर, ऋतुजा सावंत भोसले, मेघना राऊळ, मोहन जाधव, प्रशांत कासकर, संदीप कांदे, शेखर जाधव, नेपोलियन डिसोझा, आश्लेषा पारकर, विनीता सातार्डेकर, सुमती कासकर, विघ्नेश सातार्डेकर, मिहिर कासकर, नूतन पावसकर, महेश खानोलकर, परेश परब, प्रसाद परब, वैभव पारकर, सौ.सौदागर, पूजा पटेकर, मोहिनी पटेकर, परशुराम पटेकर, भूमी पटेकर, निमिष पटेकर आदी पटेकर कुटुंबीय, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव विनायक गांवस यांनी केले. तर आभार सचिव राजू तावडे यांनी मानले.

You cannot copy content of this page