⚡मालवण ता.२५-:
मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषेतील साहित्याचे वाचन होणे गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी मराठी साहित्यकृती वाचून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पत्रकार व समुपदेशक संग्राम कासले यांनी मालवण न्यायालय येथे मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सहायक अधीक्षक प्रशासन श्री एस. एन.पालव, सहायक अधीक्षक वित्त श्रीमती एम. एम. मोर्ये आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संग्राम कासले म्हणाले, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आजची युवा पिढी वाचनापासून दूर होत चालली आहे. परंतु या पिढीला पुन्हा वाचन संस्कृतीशी जोडणे आवश्यक आहे. कारण वाचन संस्कृतीच्या माध्यमातून आपण युवा पिढीला मूल्य व संस्कार देण्याचे काम करत असतो. आपल्याला युवा पिढी जर संस्कारक्षम बनवायची असेल तर त्यांना वाचनाची गोडी लावण्याची गरज आहे व त्याची सुरुवात आपण प्रत्येकाने घरातूनच केली पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालयामध्ये जाणाऱ्या युवा वर्गाचे प्रमाण हे कमी झाले आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी शाळा, महाविद्यालयीन स्तरावर सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाचक स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा यासारख्या स्पर्धांचे सातत्याने आयोजन होणे गरजेचे आहे. जर अशा पद्धतीने उपक्रम राबवले गेले तर साहजिकच आजची युवा पिढी पुन्हा वाचन संस्कृतीकडे वळेल, असेही संग्राम कासले म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कनिष्ठ लिपिक सुविधा जाधव यांनी मानले.
