राष्ट्रवादीचे अमित सामंत व काका कुडाळकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी_
*💫कुडाळ दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या तौक्ते चक्रिवादळात आपदग्रस्त झालेल्या जनतेला शासकीय निकष बाजूला ठेवून शासनाने मदत करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील व जिल्हा संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या तौक्ते चक्रिवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांचेकडून फोन द्वारे घेतला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल झालेल्या तौक्ते चक्रिवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. सुमारे ५८ वर्षापेक्षा जास्त कालावधी नंतर एवढ्या मोठ्या वादळाचा सामना जिल्हावासियानी केला आहे. दोन दिवस संपुर्ण जिल्ह्याला सोसाट्याच्या वाऱ्याने व पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांत घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त घरे व मांगरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हातातोंडाशी आलेले आंबा, काजू, कोकम यासारखी नगदी पीक मातीमोल झालेली आहेत. तर माड पोफळी यांचेही अपरीमीत नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. या मच्छीमारांच्या घराबरोबर त्यांच्या होड्यांचेही नुकसान झाले आहे. गेल्या बर्ष भरापासून कोरोना संकटाशी मुकाबला ग्रामीण भागातील जनता करत आहे.
